
मुंबई, दि. ४: रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मौजे कापरे येथील साठवण तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अदा करावा तसेच साठवण तलावाच्या बांधकामातील सर्व अडचणी दूर करून रखडलेले काम त्वरित सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कापरे साठवण तलावासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस विधानसभा सदस्य रवींद्र चव्हाण, माजी आमदार विनय नातू, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत साठवण तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसेच तलावाच्या बांधकामातील विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मौजे कापरे साठवण तलावासंदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता करून साठवण तलावाचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले.
००००
मोहिनी राणे/स.सं