मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे महत्त्वाचे दस्तऐवज प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांसाठी शासनाने खुले केले असून ते अधिकाधिक नागरिकांनी नक्की पाहावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचनालयातर्फे सेवा सप्ताह निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील अत्यंत दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, पुरालेख संचालनालयाचे संचालक सुजीत उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची दुर्मिळ छायाचित्रे, पत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. राज्य शासनाकडे अशी साडे सतरा कोटी कागदपत्रे असून कागदपत्रांच्या दृष्टीने आपण अत्यंत समृद्ध आहोत. ही कागदपत्रे योग्य पद्धतीने जतन व्हावी, म्हणून शासन वांद्रे कुर्ला संकुलमध्ये पुराभिलेख भवन उभे करीत असून अभ्यासकांसोबतच ही कागदपत्रे सर्वसामान्यांनाही पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा आपला वारसा आहे, असे सांगत मंत्री ॲड. शेलार यांनी ही कागदपत्रे नक्की सगळ्यांनी पाहावीत, असे आवाहन केले.
०००
संजय ओरके/विसंअ/