मुंबई, दि. ३० : मे, जून, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत २,२५०/- कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा ६ कोटी १७ लाख ५० हजार रुपये हा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणाऱ्या सवलती लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एकूण १ कोटी लाख एकर क्षेत्र बाधित झाले आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना २२५० कोटी रूपयांची मदत करण्यात आली आहे. शेतकरी या संकटातून पुन्हा कसा उभा राहील, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेऊन संवेदनशीलपणे मदत तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान, जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहोत. दहा किलो तांदूळ, गहू आणि तीन किलो डाळ उपलब्ध करून दिली आहे. निसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली आहे. केंद्रामार्फतही शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन सकारात्मक आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे हित साधणारे असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी दिली.
०००
संध्या गरवारे/विसंअ/