Pune | Thu, 09 October 2025

Ad

प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Sunil Goyal | 6 views
प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ७ :  ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना  केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या.

मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप -बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) किरण होळकर यांच्यासह आयएफएटी चे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी व चालकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. त्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना उत्पन्नातील ८० टक्के परतावा देणे अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले समुच्चयक धोरण येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. या धोरणामुळे ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांवर शासनाचे नियंत्रण राहील.  त्यामुळे प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना न्याय मिळेल.

राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने या धोरणाच्या माध्यमातून ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच चालकांच्या हक्काचे व अधिकाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp