Pune | Mon, 16 February 2026

Ad

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

Sunil Goyal | 28 views
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

बारामती, दि.२९: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असताना राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले असता विविध संस्था, नागरिकांकडून सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या तीन दिवसात २७ लाख ५२ हजार ३०० रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १५ लाख रुपये, नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, करंजे २ लाख ५० हजार, अक्षय शिंदे फाऊंडेशन २ लाख, बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ १ एक लाख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती १ एक लाख, शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था १ एक लाख, संदीप जगताप आणि भारत गावडे यांनी प्रत्येकी १ एक लाख, बारामती सराफ असोसिएशन ७५ हजार, पंकज निलाखे यांनी ५१ हजार, श्रीपाल नागरी पतसंस्था ५१ हजार, बारामती तालुका मराठा सेवा संघ २५ हजार, नितीन आटोळे २५ हजार रुपये, बारामती तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन २१ हजार, अजयश्री बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था, मुरुम २१ हजार रुपये, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना ११ हजार, छत्रपती शिवाजी महाराज विकास सोसायटी १० हजार, सुनील राजेभोसले १० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज

करंजेपुल येथे राजनंदिनी आणि राजवीर मालेगावकर यांनी आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज असल्याची भावना व्यक्त करत आपल्या खाऊचे जमा केलेले २ हजार ३०० रुपये रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून दिली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले.

राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून या संकटकाळात राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना धीर देत त्यांचे जीवनमान पूर्वपदावर आण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे, संकटाच्याकाळात एकमेकांना मदत करणे ही आपल्या राज्याची परंपरा व संस्कृती आहे. आगामी काळातही पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp