धुळे, दि. 9 ऑक्टोबर 2025 (जिमाका वृत्तसेवा) : माहितीचा अधिकार अधिनियम कायद्याच्या प्रभावी अंमलवणीसाठी माहिती मागणारा अर्जदार,जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, माहिती आयोग अशांनी समन्वयाने काम केले, तर माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे राज्य माहिती आयोग खंडपीठ, आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी केले.
माहिती अधिकार सप्ताहानिमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, नागरिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे चर्चासत्र कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज झाला. त्यावेळी आयुक्त श्री. गुरव बोलत होते. या चर्चासत्र कार्यक्रमांस अवर सचिव चंद्रकांत कातमोडे, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री. गुरव म्हणाले की, राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी मिळून समन्वयाने काम केली तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होवून जनसामान्यास मिळणारी माहिती योग्यरित्या यंत्रणांना देणे सोईचे होईल. माहिती मागणाऱ्या अर्जदाराने जी माहिती मागायची ती मोघम मागू नये. माहितीचा मागण्याचा अर्ज व्यवस्थित निट व परिपूर्ण भरावा. अर्जदाराने स्वत:चे नाव, पत्ता, ईमेल, दूरध्वनी क्रमांक योग्य भरावा. तसेच नि: शुल्क माहिती मागतांना संबधित अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे किंवा नाही याचा योग्य पुरावा जोडल्या असल्याची खात्री करावी. जन माहिती अधिकाऱ्यांने अर्ज प्राप्त झाल्यावर अर्ज निट तपासावा. प्रत्येक मुद्दयाने निट अवलोकन करुन विहित वेळेत अर्जदारास माहिती उपलब्ध करुन द्यावी. नागरिकांना अधिनियमाचा योग्य वापर करण्यास प्रोत्साहीत करुन अधिनियमाचा गैरवापर टाळण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या चर्चासत्रात जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, नागरिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. चर्चासत्रात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
000