Pune | Wed, 29 July 2026

न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

Sunil Goyal | 4 views
न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी परस्पर समन्वयातून तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते संजय वेंगुर्लेकर व रमेश वायदंडे, एमएमआरडीएचे प्रतिनिधी नामदेव गव्हाणे, तहसीलदार स्मिता मोहिते तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल मंडळामार्फत राबविण्यात येणारी ही २२८ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेची योजना असून, त्यापैकी १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पनवेल महानगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित न झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. विशेषतः कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी समन्वयातून तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण होऊन योजना लवकर कार्यान्वित होईल आणि पनवेल शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

राज्यातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यास शासन प्राधान्य देत असून, संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
0000
गजानन पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा