
मुंबई, दि. ७ : राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत एकूण २,३०,६५३ आरोग्य शिबिरे घेण्यात आली, ज्यामध्ये ३,४१३ विशेष शिबिरांचा समावेश होता. या शिबिरांमध्ये १ कोटी ८ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३२ लाख ७१ हजार पुरुष आणि ७५ लाख ८७ हजार महिला लाभार्थी ठरल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा…. ७५ वर्षे’ यानुसार राष्ट्रीय स्तरावर ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान देशात राबविण्यात आले. महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्त्रीशक्तीला आरोग्य शक्तीची साथ देण्यासाठी आणि महिला आरोग्य व सशक्तीकरणाला प्राधान्य देण्यासाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान राबविले गेले. या अभियानांतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसह विविध जनजागृती उपक्रम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन जिल्हा आणि महापालिका स्तरावर करण्यात आले. या शिबिरांमध्ये महिलांच्या असंसर्गजन्य आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग व रक्तदाब तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, बालकांचे लसीकरण, पोषण व मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिरे, नि-क्षय मित्र नोंदणी मोहीम, आयुष्मान कार्ड वितरण, प्रधानमंत्री मातृ वंदना कार्ड वितरण आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. अभियान यशस्वी व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागासोबत शिक्षण, महिला व बाल विकास, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व नगरविकास विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
अभियानादरम्यान विविध आरोग्य घटकांवर लक्ष
लोकप्रतिनिधींचा आणि प्रसार माध्यमांचा सक्रिय सहभाग
जिल्हा आणि महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून या अभियानाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही या अभियानाला आपला पाठिंबा देत अभियानांतर्गत शिबिरांची माहिती देऊन जनजागृती केली.
या अभियानात राबविण्यात आलेल्या व पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा, तपासणी व निदानातून आढळलेल्या आजारांचा पाठपुरावा संबंधित जिल्ह्यातील आरोग्य संस्था करणार असून यामुळे सामान्य नागरिकांना व विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १०,७६६ उपकेंद्रे, १९३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, १,०४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, ३७२ ग्रामीण रुग्णालये, १०२ उपजिल्हा रुग्णालये, आठ सामान्य रुग्णालये, २२ स्त्री रुग्णालये, दोन संदर्भ सेवा रुग्णालये व १९ जिल्हा रुग्णालये तसेच विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी हिरीरीने सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी केले.
या अभियानाचे उद्दिष्ट केवळ तपासणी नव्हे, तर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम करणे हे होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आरोग्य जनआंदोलनाच्या दिशेने एक सकारात्मक टप्पा आहे.
अभियानाच्या शुभारंभाच्या दिवशीच १,४६,७९८ नागरिकांना २० प्रकारच्या विविध आरोग्य सेवा
राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ रोजी विविध विभागात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या दिवशी एकूण १,४६,७९८ नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. ठाणे विभागात सर्वाधिक ३२,२९९ लाभार्थी, कोल्हापूर जिल्ह्यात २४,९५० लाभार्थी, तर नागपूर विभागात – २४,६०४ लाभार्थी होते.
शुभारंभ दिनी या अभियानांतर्गत ११७ विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. एनसीडी तपासणी शिबिरांत १७,७७९ लाभार्थी, नेत्र तपासणीत ३,१०४, दंत तपासणीत ३,३५८, तर मातृ आणि बाल आरोग्य शिबिरांत ७,३२२ महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेल्या पोषण जनजागृती सत्रात १०,०९१ महिला व बालकांनी सहभाग घेतला. याशिवाय, मोफत औषध वितरण शिबिरांद्वारे २७,३४४ लाभार्थ्यांना औषधे पुरविण्यात आली, ११,३४५ नागरिकांच्या डायग्नॉस्टिक तपासण्या पार पडल्या, तर कर्करोग तपासणी व जनजागृती सत्रांमध्ये ९,८४२ नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात आला. मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरांद्वारे ४,२९६ नागरिकांना मार्गदर्शन मिळाले, तसेच व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमांत ३,३५७ नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती – ७,७५५ लाभार्थी, आरोग्य मेळावे – ८,०३२, शाळांमधील तपासण्या – ६,५९१ आणि रक्तदान शिबिरांमध्ये ७१५ रक्तदाते यामुळे अभियानाला सर्वांगीण प्रतिसाद मिळाला.
या व्यापक प्रयत्नांतून राज्यभरात आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असून, महिलांचे आरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये
शिबिरांचे आयोजन (एसएनएसपीए पोर्टल)
इतर संस्था (केंद्रीय सरकारी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी संस्था)
असंसर्गजन्य रोग (एनसीडी) तपासणी (एनसीडी पोर्टल)
प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच पोर्टल)
U-WIN पोर्टल
नि-क्षय (टीबी) कार्यक्रम (नि-क्षय पोर्टल)
सिकलसेल तपासणी (SNSPA गुगल शीट)
समुपदेशन सत्रे (SNSPA गुगल शीट)
पीएमजेएवाय/वय वंदना कार्ड (आयुष्मान भारत पोर्टल)
आभा कार्ड
रक्तदान (ई-रक्तकोश पोर्टल)
अवयवदान (एसएनएसपीए पोर्टल)
000
संजय ओरके/विसंअ/