
नवी मुंबई, दि. 15 (विमाका) : ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागात आरोग्य विभागामार्फत व्यापक आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. 10 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दरम्यान गाव व वस्ती स्तरावर आयोजित विशेष वैद्यकीय शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 1 हजार 765 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून एकूण 65 हजार 96 नागरिकांनी आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 532 शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात 457, पालघर जिल्ह्यात 240, रायगड जिल्ह्यात 423 आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 113 शिबिरे पार पडली आहेत. या शिबिरांमधून ठाणे जिल्ह्यात 27 हजार 78, पालघरमध्ये 9 हजार 34, रायगडमध्ये 14 हजार 883, रत्नागिरीमध्ये 19 हजार 816, आणि सिंधुदूर्गमध्ये 4 हजार 285 नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. विविध ठिकाणी आयोजित शिबिरांदरम्यान जनजागृती बॅनर्स लावण्यात आले. तसेच या उपक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी छायाचित्रे आणि व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.
या आरोग्य शिबिरांमध्ये सिकलसेल, रक्तक्षय (अॅनिमिया), क्षयरोग (टीबी), असंसर्गजन्य आजार, तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच गरजूंना मोफत औषधोपचार, वैद्यकीय सल्ला आणि पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाने राबविलेल्या या व्यापक उपक्रमांमुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला मोठा आधार मिळत आहे. आगामी मुख्य समागमाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सज्ज असून, लाखो भाविकांना सुरक्षित आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
