
मुंबई, दि. २३ :- राज्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यशासन खंबीरपणे उभे असून खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी आतापर्यंत २,२१५ कोटीची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री करणार आहेत. आपण स्वतः बुलढाणा, अकोला, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून जस-जसे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल शासनास प्राप्त होतील त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी तत्काळ मदत जाहीर करण्यात येईल.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना आदेश दिले असून ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हवामान विभागामार्फत राज्यात २७ आणि २८ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा जोरात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/
