
मुंबई, दि. १८ : सर्वसमावेशक विकास, जागतिक गुंतवणूक, नवतंत्रज्ञान आणि युवकांच्या सहभागातून भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने शासनाची गतीमान वाटचाल सुरू आहे. येत्या काळात भारताला सर्व क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन कृतिशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केले.

विदेश मंत्रालय, फ्युचर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन कौन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को ऑपरेशन समिटमधील संवाद सत्रात केंद्रिय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल बोलत होते. एफइसीआयसीचे कार्यकारी संचालक विजय चौथायवाला यांनी या संवादसत्राचे संचलन केले.
भारताला पुढील दोन दशकांत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्याचा निर्धार शासनाने केला आहे. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देश विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त करून वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या सर्वसमावेशक आणि जनकेंद्रित योजनांमुळे देशातील गरीब, वंचित आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने काम करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याला प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने आर्थिक समावेशन, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. गरीब कुटुंबांना निवारा, स्वच्छता सुविधा, गॅस जोडणी, मोफत धान्य आणि आरोग्य संरक्षण देणाऱ्या विविध योजनांमुळे जीवनमान उंचावले आहे. वंचित, मागास आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अधिक प्रभावी करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक
देशभरात महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या विकासाला गती देण्यात आली आहे. ‘गती शक्ती’सारख्या उपक्रमांद्वारे विविध प्रकल्पांचे समन्वयित नियोजन केले जात आहे. उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून, उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहेत.
युवा पिढी आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन
शासनाने ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’सारख्या कार्यक्रमांतून युवकांना कौशल्यविकास आणि उद्योजकतेसाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि जागतिक बाजारपेठांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुहेरी पदवी आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देऊन भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव मिळवून देण्यावर भर आहे.
तंत्रज्ञान आणि पारदर्शकता
डिजिटल इंडिया मोहिमेमुळे शासनाच्या सेवांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. डिजिटल व्यवहार, ई-गव्हर्नन्स आणि पारदर्शक यंत्रणेद्वारे भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचत असल्याने मध्यस्थी टळली आहे.
भारतामध्ये भविष्यात गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकतेसाठी मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, विकसित देश भारताला प्रगत तंत्रज्ञान, भांडवल आणि जागतिक बाजारपेठांशी जोडण्यास मदत करू शकतात. त्याचवेळी भारतीय स्टार्टअप्स आणि तरुण उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी केले.
०००
वंदना थोरात/विसंअ
