
नवी दिल्ली, दि. २२: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाबाबत आणि कोळंबी उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीत प्रामुख्याने एसपीएफ कोळंबी ब्रूडस्टॉक, पीपीएल आणि जिवंत खाद्य आयात करण्याशी संबंधित विविध कायदेशीर व तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोळंबी उत्पादनात शाश्वत वाढ साध्य करतानाच जैवसुरक्षेचे कडक नियम पाळणे, आयात प्रक्रिया सुलभ करणे आणि देशातील मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल उपस्थित होते. तसेच, भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, विभागातील वरिष्ठ अधिकारी, आयसीएआर (ICAR) संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ, एमपीईडीए आणि सीएए चे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळंबी शेती, हॅचरी, निर्यात आणि मत्स्य खाद्य क्षेत्रातील विविध भागधारकांनीही या चर्चेत सहभाग घेऊन मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी आपली मते मांडली.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
