
मुंबई, दि. १७ :- महाराष्ट्र खनिकर्म व गुंतवणूक परिषद एप्रिल महिन्यात मुंबईत आयोजित करताना राज्यात खनिकर्म क्षेत्रात गुंतवणूक व रोजगार वाढतील असे नियोजन करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघदूत या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, खनिकर्म विभागाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खनिकर्म क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना, राज्यात उपलब्ध असलेल्या खनिजांची माहिती,या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि तज्ज्ञांचे सल्ले जाणून घेण्यासाठी संवादसत्रांचे आयोजन करावे. विकसित भारत २०४७ ची उद्दीष्टे लक्षात घेवून या कार्यक्रमाची आखणी करावी.,खनिकर्म क्षेत्रासंबधित उद्योगांचा विकास करणे, या क्षेत्रातील उद्योजक, भागीदार, गुंतवणूकदार, उद्योगतज्ज्ञ यांचा सहभाग वाढवावा. खनिकर्म व पर्यटन क्षेत्राशी संलग्नता वाढविणे यावर भर देण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारकडून खनिकर्म विभागाला देण्यात येणा-या विविध परवानग्या व त्यामध्ये सुलभता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचीही माहिती या परिषदेत होण्यासाठी काटेकोरपणे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशही खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
००००
संध्या गरवारे/विसंअ
