Pune | Sat, 14 February 2026

Ad

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 2 views
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मंत्री पंकजा मुंडेंची ‘उद्योजक’ योजनेची घोषणा

बीड/परळी वैजनाथ (दि. १४): “आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परळीतील अंबेजोगाई रस्त्यालगत ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी  एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.

शेतीला ‘क्लायमेट रिस्क’ मधून वाचवणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हे प्रदर्शन केवळ एक सोहळा नसून कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन ‘राज्यमाता’ असा दर्जा दिला आहे.”

तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, “पंजाबमध्ये गाय १०-१५ लिटर दूध देते, तर आपल्याकडे २.५ लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. पशुधन संवर्धन, आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन’ चा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात ‘मदर्स डेअरी’ सोबत करार देखील करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास नको

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतील, या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गावातला तरुण होईल ‘पशुधन उद्योजक’ – मंत्री पंकजा मुंडे

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “केवळ नोकरीच्या मागे न लागता गावातील तरुणांनी मालक बनावे, यासाठी आम्ही लवकरच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ आणत आहोत. महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत आहे.” तसेच पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. हा दर्जा दिल्याबद्दल मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनीही परळीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांसमोर मागण्या मांडल्या. तसेच बीड व परळीचे विकासासाठी कायम निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

विजेत्यांचा गौरव

अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी पालन योजनेतील विजेत्यांना आणि गोपाळ रत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या 10 व्या अंकाचे प्रकाशन व विभागाच्या ‘दिनदर्शिका 2026’चे अनावरण केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महापशुधन एक्स्पो 2026’मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण केले. जिरेवाडी, ता. परळी येथील तुळजाई महिला स्वयंसहायता समूहास ₹15,00,000 इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील ‘उमेद सखी – महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ला शासन अनुदानाच्या ₹12,27,500 या प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले.

सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

विदर्भ मराठवाडा दुग्धोत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळ नागपूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल मुकणे आणि मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोमनाथ माने त्यासोबतच डॉ. दिनकर बोर्डे उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा व विदर्भ मराठवाडा उत्पादन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोराडे यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराराच्या प्रति हस्तांतरित करण्यात आल्या.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली, स्मृती दालनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध पशुधनाची पाहणी केली. पाहणीत त्यांनी पशु पालकांचे कौतुक केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृती दालनाचे उद्घाटनही त्यांनी केले. मुख्य कार्यक्रमस्थळी सुरुवातीला राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परळी नगरपरिषदेच्या स्व. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025” पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीमती ढवण सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सायली संजीव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी आभार मानले. या सोहळ्याला परळीतील नागरिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

🔘  उदगीर प्रकल्प:  उदगीरचे दूध भुकटी केंद्र १०० कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार.

🔘  नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या ‘जीवामृता’ला प्रोत्साहन.

🔘  आरोग्य सेवा: राज्यातील २८४१ पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे जाळे.

🔘  विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या ४-८% वरून २५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

🔘  राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३६६ प्रकल्पांना मंजुरी.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp