Pune | Mon, 16 February 2026

Ad

शिवजयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

Sunil Goyal | 1 views
शिवजयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, पदयात्रा तसेच ऐतिहासिक वारसा जपणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मुंबई शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

Milind Kadam M4B

मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा आयोजनासंदर्भात मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त्त जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, या पदयात्रेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी शैक्षणिक संस्थांशी तत्काळ समन्वय साधून नियोजन करावे. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनामधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. पदयात्रेत अधिकाधिक शासकीय अधिकारी, महिला, युवक आदी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा करून योग्य अंमलबजावणी करावी.

रवींद्र नाट्य मंदिरात लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शननाटक

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सकाळी १०.३० वाजता ‘लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन’ या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देत त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कारभाराचे दर्शन या नाटकातून घडविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई टाऊन हॉल (सेंट्रल लायब्ररी), शहीद भगतसिंग रोड, फोर्ट येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे शिवरायांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रयोगात्मक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp