Pune | Tue, 17 March 2026

Ad

टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 12 views
टीएमएस २.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.23 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात  टीएमएस 2.0 प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4 हजार 537 रुग्णालयांमध्ये 2 हजार 399 मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे. या टीएमएस 2.0 प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव  डॉ विनायक निपुण, सचिव ई रविंद्रन, जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चव्हाण आदी उपस्थित होते.

टीएमएस 2.0 प्रणाली विषयी…

या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन होणार आहे.  रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.  जलद उपचार मंजुरी प्रक्रिया व उपचार स्थितीचे डिजिटल ट्रॅकिंग, डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता मॉनिटरिंगद्वारे तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालय अंगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व विहित मर्यादेत पूर्ण होणार आहे.

या योजनेअंतर्गत फसवणूक झाल्यास 155388, 1800233200 या हेल्पलाइनलवर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp