
यवतमाळ, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बेंबळा प्रकल्प, बेंबळा कालवे पुनर्वसन आणि डेहणी उपसा सिंचन योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालय महसूल भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जलसंपदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा घेताना पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि सिंचन व्यवस्थेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
“शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या सिंचन योजनांचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करत सिंचन प्रकल्पांना गती द्यावी,” असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
