
मुंबई, दि. 12: भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर आणि बहुआयामी गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वातील तारा निखळला असून एका संगीतमय सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोक संदेशात वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हजारो गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. शास्त्रीय, भावगीत, गझल, पॉप, तसेच चित्रपटसंगीत अशा विविध प्रकारांत त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना आनंद, प्रेरणा आणि भावनिक आधार दिला. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजामुळे त्यांना देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली होती.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे केवळ एक महान गायिका नाही, तर एक युगच हरपल्याची भावना व्यक्त करून मंत्री श्री. नाईक यांनी यांनी श्रीमती भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
