Pune | Sun, 12 April 2026

Ad

ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

Sunil Goyal | 1 views
ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका  – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

मुंबई, दि.१२ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC)  करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC)  करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ईकेवायसी (EKYC) च्या बहाण्याने लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

“ईकेवायसी (EKYC)  करून देतो” असे सांगून काहीजण महिलांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच खोट्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

*****

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp