Pune | Thu, 09 April 2026

Ad

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प – मंत्री नितेश राणे

Sunil Goyal | 1 views
ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प – मंत्री नितेश राणे

रायगड-अलिबाग,दि.०८(जिमाका): आक्षी येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागते. यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होत असते. या पार्श्वभूमीवर आक्षी साखर, ता. अलिबाग येथील ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे व अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.  आक्षीसाखर, ता.अलिबाग येथे  ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे कामाचा भूमिपूजन सोहळा प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, आस्वाद पाटील, चित्रातीई पाटील,  नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर आदि उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर हे गाव आक्षी खाडी किनारी वसले असून येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी व पर्यटन आहे. अलिबाग परिसरात सुमारे 1 हजार 108 मच्छिमार असून वार्षिक 8 हजार 748 टन मत्स्यउत्पादन होते, तर आक्षी साखर येथे 863 मच्छिमारांकडून सुमारे 2 हजार 297 टन उत्पादन घेतले जाते. एकदरा खाडीतही मोठ्या प्रमाणावर, सुमारे 11.045 टन वार्षिक मत्स्यउत्पादन नोंदवले जाते.या प्रकल्पास 19 सप्टेंबर 2024 रोजी 159.92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून 30 ऑक्टोबर 2025 रोजी 151.78 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तसेच 26 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 192 व्या MCZMA बैठकीत पर्यावरणीय मंजुरीही प्राप्त झाली आहे.

या प्रकल्पांतर्गत पूर्वेकडे 1125 मीटर व पश्चिमेकडे 1110 मीटर अशा एकूण 2235 मीटर लांबीची लाटरोधक भिंत उभारण्यात येणार आहे. यासोबत नौवहन मार्गातील गाळ काढणे, 80 मीटर x 10 मीटर आकाराच्या दोन जेट्टींचे बांधकाम, जेट्टीमागील भराव आणि 400 मीटर लांबीचा जोडरस्ता उभारण्यात येणार आहे.

या कामासाठी 127.61 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून दि. 16 मार्च 2026 रोजी Yashog Infra Infrastructure and Developers Pvt Ltd यांना हे काम देण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

या कामामुळे खाडीतील गाळ साचण्याची प्रक्रिया आटोक्यात येऊन नौकानयन मार्ग मोकळा होईल. मच्छिमारांना कोणत्याही भरतीवेळी बोटींची सहज ये-जा करता येईल व सुरक्षित बंदर उपलब्ध होईल. तसेच किनारपट्टी संवर्धनामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाला मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सदस्य तसेच आक्षी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp