सातारा दि.9 : पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतू ते ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे बहुउद्देशिय असले पाहिजे, त्याचा कौशल्य विकास झाला पाहिजे. माणूस सर्वांगीण विकसित झाला पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण व्दारा बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या नवीन अभ्यासक्रमांचा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचा व नवीन विस्तारित इमारतीचा उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजितसिंह पाटणकर, अमित कुलकर्णी अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार आदी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, माणसाने स्पर्धा करावी ती स्पर्धा ज्ञानाशी असावी. स्टार्टअप इंडियामध्ये जगभरात आपण पोहचलो आहोत. भारताकडे बुद्धीमत्ता आहे फक्त आधाराची गरज असते. जगाभरातील अनेक कार्पोरेट कंपन्यांचे सीईओ भारतीय आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात वस्तीगृहांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक संजीव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक डांगे यांनी तर आभार एस डी पवार यांनी मानले.
0000