
नाशिक, दि. ८ (जिमाका ): इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकास या बाबींना प्राधान्य देऊन १५ दिवसांच्या आत सविस्तर कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

इगतपुरी शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय सभागृह येथे इगतपुरी नगरपरिषद व तालुक्यातील विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी इगतपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शालिनी साबळ , माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, तहसीलदार अभिजीत बारवकर, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, इगतपुरीकरांना दररोज शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पाणीपुरवठा योजनेची क्षमता अपुरी पडत असल्याने वितरण यंत्रणा मजबूत करून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करावे. पाणीउचल, साठवण आणि वितरण यामध्ये तांत्रिक सुधारणा करावी. शासकीय रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
०००
