
मुंबई,दि.२७ : शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र प्रभाव आणि शाश्वतता अभिसरण कार्यक्रम अंतर्गत ‘प्रभाव अभिसरण’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागचे प्रधान सचिव, डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, तसेच कुटुंब कल्याण आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी (सीएसइार)चा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा उभारणीसाठी संस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्यक्ष योगदान दिल्यास आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो.
सार्वजनिक आरोग्य विभागासोबत सातत्याने समन्वय साधत सीएसआर उपक्रम राबविल्यास राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सामाजिक दायित्व (सीएसआर) संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, विविध संस्थांनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आरोग्य विभागाशी समन्वय साधून काम केल्यास राज्यातील आरोग्य सुविधा निश्चितच सुधारतील.
यावेळी ‘महाराष्ट्रात आरोग्य सेवा वितरणाचे सक्षमीकरण’ या विषयावर सहयोगात्मक चर्चा आयोजित करण्यात आली. शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची रूपरेषा मांडत भागीदारीच्या संधींचा आढावा घेण्यात आला. विकास क्षेत्रातील अग्रणी संस्थांनी त्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती देत अंमलबजावणीतील अडचणी, त्रुटी आणि आव्हाने यावर प्रकाश टाकला. तसेच, उच्च-प्रभावी व विस्तारक्षम उपक्रमांची संयुक्त निवड करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी एईडी (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर) आणि सीपीआर (बेसिक लाईफ सपोर्ट) प्रशिक्षणाचा व्यापक प्रसार करण्यासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी राज्य शासनाची आरोग्यविषयक दृष्टी आणि विविध घटकांमधील अभिसरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
०००००००
राजू धोत्रे / वि.सं.अ
