Pune | Sun, 12 April 2026

Ad

क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

Sunil Goyal | 1 views
क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

धुळे, दि. ११ (जिमाका): धुळे जिल्ह्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही  आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

देवगिरी कल्याण आश्रम, धुळे व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा (शेमल्या) येथे क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या शौर्य स्मृतीदिनानिमित्त पारंपारिक वाद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री डॉ. वुईके बोलत होते. या कार्यक्रमास आमदार काशीराम पावरा, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, प्रकल्प अधिकारी (यावल) अरुण पवार.जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी निलेश राठोड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे कार्य आणि बलिदान अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करण्यात येईल, तसेच दरवर्षी 11 एप्रिल रोजी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शौर्य दिन साजरा करण्यात येईल. आदिवासी विकास विभागाच्या राणी दुर्गावती सबलीकरण योजनेच्या माध्यमातून महिलांना उमेद व माविमच्या धर्तीवर महिला बचत गट निर्माण करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत जनजाती समाजाच्या इतिहासात इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी क्रांतिकारांचे पुस्तक बोलीभाषा मातृभाषाचे संवर्धन करण्यात येईल.

आदिवासी जनजातींना लाभ देण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी  आठवड्यातून दोन दिवस साक्री व शिरपूर येथे दुर्गमभागातील नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मेळावे, कार्यशाळा, संवाद सत्र आयोजित करावे. आदिवासी विभागाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात महिला बचत गट निर्माण करावे. शिरपूर तालुक्यातील हजारो महिला बचतगट निर्माण करुन निधी मंजूर करुन देऊ. आदिवासी समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी लघु  व सुक्ष्म उद्योग निर्माण करण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयेाजन करावे.  शासकीय व अनुदानीत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी सन 2026-27 वर्षांत दोन महिन्यांत  पात्रताधारक शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी संस्कृतीचे दर्शन, गौरवशाली इतिहास, देव, दैवत, कुलदैवत, अस्मिता  जिवंत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

आमदार काशीराम पावरा यांनी क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याचे स्मरण करून त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्मृतीस्थळाचा सर्वांगीण विकास, सुशोभीकरण, रस्ते व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच शौर्य दिन शासनस्तरावर साजरा करण्याची मागणी त्यांनी मंत्री डॉ.वुईके यांच्याकडे केली.

कार्यक्रमात पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. वुईके यांनी स्मृतीस्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली व वाद्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.

या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी शेतकरी व नागरिकांशी साधला संवाद

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज शेतकरी व स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बोराडी येथील के.व्ही.टी.आर आयुवैद महाविद्यालयात या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, प्रकल्प अधिकारी (यावल) अरुण पवार.जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी निलेश राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, सरपंच सुकदेव मालचे, उपसंरपच राहुल रंधे तसेच मोठया प्रमाणात शेतकरी व नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके यांनी प्रत्येकाची समस्या ऐकून घेतली. यात आदिवासीचे वनपट्टेधारकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी स्वंतत्र सातबारे मिळण्यासाठी जिल्हास्तरावर बैठकीचे आयोजन करावे. आदिवासी जनजातींना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत विहीर, सोलरपंप, सिंचन व्यवस्था, बी.बियाणे उपलब्ध करुन द्यावे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यांवा. विद्यार्थ्यांन शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत वितरीत करावी. पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनांचा लाभ देण्यात यावा. आदिवासी विकास विभागातील नामांकित इंग्रजी शाळेचे त्रयस्त संस्थेमार्फत ऑडीट करावे. आदिवासी विकास विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती, पेसा क्षेत्रातील नोकर भरती, मानधन त्तवावरील शिक्षकांना नियमित करणे, अतिक्रमरण धारकांचे घरे नियमाकुलीन  करणे, क्रांन्तीवीर राघोजी भांगरे गुणवंत पुरस्काराची रक्कम त्वरीत देण्यात बाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रांरभी, मंत्री डॉ.वुईके यांनी लिलाई हॉस्पिटला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित शेतकरी, नागरिकांनीही आपल्या समस्या थेट मांडण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले. संवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होत असून अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगितले.

०००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp