Pune | Tue, 04 August 2026

महसूल विभागाने सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Sunil Goyal | 9 views
महसूल विभागाने सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ४ (जि. मा. का.) : महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या विभागाचा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने आपल्या उत्तरदायित्वाची जाणिव ठेवून सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी नीता शिंदे आणि विजया यादव व्यासपीठावर उपस्थित होते.

महसूल दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या महसूलमंत्री पदाच्या कार्यकालात ऑनलाईन सात बारा चा निर्णय घेतला. राज्यातील अडीच कोटी सात बारा ऑनलाईन करण्यात आले. याचबरोबर महसूल विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना घरात बसून या सेवांचा लाभ घेता येत आहे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये महसूल विभागाची भूमिका केंद्रस्थानी असते. जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारा आणि शासनाची प्रतिमा उजळवणारा हा विभाग आहे. त्यामुळे, प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेने पार पाडावी, कामातील दिरंगाई टाळावी, असे सांगून कोणतीही अडचण आली तर ती सोडवू, असे सांगून त्यांनी प्रशासनाच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, महसूल यंत्रणा शासनाचा महत्त्वाचा विभाग असून, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, पारदर्शक प्रशासन राबविणे आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे ही महसूल विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. आगामी काळात सर्वांनी पारदर्शी व लोकाभिमुख सेवा द्याव्यात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. खानापूर-विटाचे तहसीलदार योगेश टोंपे, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय तोडकर, महसूल सहाय्यक कमलेश डाळिंबे तसेच, महसूल सेवक (कोतवाल) संघटनेचे प्रतिनिधी सुधीर गोंधळी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक डॉ. स्नेहल कनिचे यांनी केले. श्रीमती लीना खरात, तहसीलदार (सर्वसाधारण) यांनी आभार मानले.

मंडल अधिकारी वैशाली वाधमोडेंचा विशेष सत्कार

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे शेंडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांच्या मंडळामध्ये पाणंद रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी “नो अपील नो वकील” हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ढालगाव मंडळामधील १४ गावांमधील पाणंद रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी रस्त्यांचे सर्वेक्षण केले. बैलगाडीतून शिवार फेरी केली. १०० पेक्षा अधिक रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ९३ रस्त्यांच्या अधिकृत नोंदी सातबाऱ्याच्या इतर अधिकार सदरी करण्यात आल्या. समझोत्याने वाद असणारे पाणंद रस्ते खुले करण्यात आले.

 DBT STATUS ॲपचे उद्घाटन

DBT STATUS ॲपद्वारे सामाजिक न्याय विभाग – योजना, सद्यस्थिती याविषयीची माहिती नागरिकांना मिळणार आहे. हे ॲप जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.

हे ॲप तयार करण्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल सतीश कदम, संजय गांधी योजनेच्या तहसीलदार शुभांगी कनवाडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक संचित पवार यांनी मेहनत घेतली.

संजय गांधी योजना DBT STATUS ॲपमुळे लाभार्थी व प्रशासनाला होणारे फायदे – ॲपच्या माध्यमातून लाभार्थीला घरबसल्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे अनुदान आपल्या खात्यात जमा झाले किंवा नाही हे कळेल. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये येऊन विचारणा करण्याकरिता लागणारा वेळ व पैसा वाचेल. लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्यास त्याचे कारण समजून त्रुटीपूर्तता करता येईल. कार्यालयामध्ये अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गर्दी होणार नाही. त्यामुळे कार्यालयातील इतर कामकाज करण्यास अधिक वेळ मिळेल.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

गौरवण्यात आलेले जिल्हाधिकारी कार्यालय व क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे – शिवाजी जगताप (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७), अजयकुमार नष्टे (उपविभागीय अधिकारी जत), श्रीनिवास अर्जुन (उपविभागीय अधिकारी वाळवा), श्रीमती लीना खरात                (तहसीलदार (सर्वसाधारण)), डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ (तहसीलदार मिरज), सुरेश मुंढे ( निवडणूक नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली), योगेश जमदाडे (महसूल नायब तहसीलदार, मिरज), श्रीमती सुप्रिया खांडे ( सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), सुनील कानडे (सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वाळवा), श्रीमती अनिता विरकर (मंडळ अधिकारी, भूसंपादन क्र. 9), श्रीमती कविता चव्हाण (मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय कडेगाव), श्रीमती सुनीता डवरी (लघुलेखक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), जगन्नाथ कदम ( ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय शिराळा), दीपक माने (महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), शैलेश जाधव (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय विटा), बाबासाहेब नाईक (वाहनचालक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), विजय वाघमारे (वाहनचालक, उपविभागीय अधिकारी कार्यालय जत), माणिक माळी (शिपाई, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), रविंद्र सुतार (शिपाई, तहसील कार्यालय पलूस), विलासराव तात्यासो पाटील (पहारेकरी, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), शिवाजी पुसावळे (कोतवाल, तहसील कार्यालय आटपाडी), गोरख चव्हाण (पोलीस पाटील, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ)

00000

आमच्यात सामील व्हा