
मुंबई, दि. ३ : गिरगाव येथील आर्यन हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांनी आपण लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला.
राज्यपाल म्हणाले की, जेव्हा लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो व जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो. एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके दिली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी आहे. राज्यात लेखकांची देखील एक मोठी परंपरा आहे. आज आपण ई-पुस्तकांच्या युगात वावरत असलो तरी देखील पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्व वेगळे आहे व पुस्तक वाचनाचा आनंद कायम आहे. नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
नामजोशी यांनी राज्यपालांना ‘मोगरा फुलाला दारी’ हा कथासंग्रह, ‘स्मृतिगंध’ हे समाजातील गणमान्य व्यक्तींशी केलेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक तसेच ‘भीमा’ ही आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची व तिच्या आईच्या त्यागाची कहाणी असलेली कादंबरी भेट दिली. यावेळी नामजोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
००००