चंद्रपूर, दि. 09 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांचा आढावा घेतला.
यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अक्षय पगारे, जया ठाकरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, प्रणीव लाटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, राजीव कक्कड, नितीन भटारकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग कामे देत नसल्याच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंत्यांना नियमानुसार कामे द्यावीत. तसेच चंद्रपूरमध्ये रस्त्यांची कामे अर्धवट असून ठिकठिकाणी गड्डे पडले आहेत. प्राधान्याने रस्त्यावरील सर्व गड्डे बुजवावीत.
आदिवासी विकास विभागाने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी. याबाबत कोणतीही टाळाटाळ करू नये. चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. तसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण ठेवावे, अशा सुचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केल्या.
०००