
मुंबई, दि. १९: महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या १५० वर्षात घडलेल्या निवडक ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय अतिथींच्या गाठीभेटी तसेच महत्वाच्या दस्तावेजांचे छायाचित्ररूपी संकलन असलेल्या ‘राज्यपाल दालनाचे’ उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १९ मार्च) लोकभवन मुंबई येथे करण्यात आले. राज्यपालांनी इतिहास व अभिलेखाच्या दालनाचे कौतुक केले व दालनाच्या माध्यमातून अधिकाधिक दस्तावेज पुढे आणण्याची सूचना केली.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना दालनात लावण्यात आलेल्या छायाचित्रे व दस्तावेजांची माहिती दिली.

दिनांक १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकभवनातील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले होते. याच बंकरमध्ये इतिहास व दस्तावेज छायाचित्र रूपाने दाखवणारे नवे ‘राज्यपाल दालन’ तयार करण्यात आले आहे. आता, लोकभवनच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन लोकभवन पाहण्यास येणाऱ्या अभ्यागतांना हे दालन पाहता येणार आहे.

असे आहे ‘राज्यपालांचे इतिहास व अभिलेख दालन’
लोकभवन या जागी स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई प्रांताचे ‘गव्हर्मेंट हाऊस’ होते. सन १९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर ‘गव्हर्मेंट हाऊस’ हे मुंबई प्रांताचे राजभवन झाले. दिनांक १ मे १९६० रोजी राज्यनिर्मितीनंतर ते महाराष्ट्राचे राजभवन झाले. अलीकडेच, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले. या सर्व स्थित्यंतरांमधील निवडक प्रसंगांची छायाचित्रे व दस्तावेजांचे पॅनेल्स दालनात ठेवण्यात आले आहे.
व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांची ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे भेट (१८९८), प्रिन्स ऑफ वेल्स जॉर्ज यांची ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे भेट (१९०५); महात्मा गांधी यांच्या ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे झालेल्या तीन भेटी (१९१५, १९३१); देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी ‘गॉड सेव्ह द किंग’ न म्हणता ‘वंदे मातरम’ गाण्याच्या सूचना असलेले शासनाचे परिपत्रक (१९४७); महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राज्यपालांनी व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना पाठवलेला शोकसंदेश (१९४८), शासकीय कार्यालयातील जॉर्ज सहावे यांचे छायाचित्र भिंतीवरून काढून त्या ऐवजी महात्मा गांधी यांचे छायाचित्र लावण्याचा शासकीय आदेश (१९४९); सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर राज्यपालांनी त्यांचे पुत्र डाह्याभाई पटेल यांना पाठवलेले भावपूर्ण पत्र (१९५०); राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे आयोजित ‘फॅशन परेड’ ची छायाचित्रे (१९६१); चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग (१९६९) यांच्या राजभवन येथे झालेल्या स्वागत समारोहाची छायाचित्रे (१९६९) तसेच सन २०११ साली विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघासाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राजभवन येथे झालेल्या स्वागत समारंभाची छायाचित्रे या विषयांवरील पॅनेल्स दालनात लावण्यात आले आहेत.
राज्यपाल दालनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, पुणे येथील कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसचे संचालक महेश ठाकूर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दालनातील छायाचित्रांची मांडणी व सजावट निधी बोलार यांची आहे; तर कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे या प्रकल्पाला सहकार्य लाभले आहे.
०००
