
मुंबई, दि. 1 : राज्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, सहसंचालक (जल) जगन्नाथ साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच औद्योगिक आस्थापनांकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येते. आतापर्यंत उभारण्यात आलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू रहावेत, यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती होण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत कंत्राटी तत्वावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच ज्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू झालेले नाहीत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस देऊन हे प्रकल्प लवकर सुरू करण्यात यावे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ
