Pune | Sun, 05 April 2026

Ad

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

Sunil Goyal | 16 views
ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत’ राबवलेल्या अभिनव उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज डिजिटल प्रशासनाचे एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे.

प्रशासकीय पारदर्शकतेचा नवा कणा: सेवा संवाद आणि डिजी संवाद…

            नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापासून मुक्ती मिळावी, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा चपखल वापर केला आहे. ‘सेवा संवाद’ या १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी सुधारणा झाली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळालेल्या सेवेचा दर्जा, दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची संधी मिळाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून अनावश्यक शुल्कावरही नियंत्रण आले आहे.

            तक्रार निवारण ही प्रशासनाची सर्वात महत्त्वाची चाचणी असते. डॉ. पांचाळ यांनी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे नागरिकांसाठी २४x७ तक्रार नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. कार्यालयात न जाताही केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्यामुळे प्रशासन अधिक प्रतिसादक्षम बनले आहे.

ऐतिहासिक वारशाचे जतन आणि भू-व्यवस्थापनात क्रांती:  ई-संजीवन व राजभूमी..

            प्रशासनाने केवळ दैनंदिन कामातच नव्हे, तर ऐतिहासिक अभिलेखांच्या जतनासाठीही दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीद्वारे सन १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टर (कोतवाल रजिस्टर) AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित केली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी काही क्षणात मिळवणे शक्य झाले आहे, जे पूर्वी अत्यंत जिकिरीचे काम होते.

     तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांना मोठा धक्का दिला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे शासकीय जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे सुलभ झाले आहे. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमण शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे आता अत्यंत सोपे झाले आहे.

  आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचे डिजिटल जाळे..

      डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने सामाजिक क्षेत्रातील सेवांचेही डिजिटल मॅपिंग केले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), शासकीय शाळा आणि ग्रामीण रुग्णालये यांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सोपे झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे, ड्रेनेज व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध असल्यामुळे भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे.

    अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुलभता आणल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन..! त्यांनी राबवलेले हे ई-गव्हर्नन्स उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील मूलभूत परिवर्तन आहेत.

     ‘१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमातंर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयांना तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयप्रमुखांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात ठाणे जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले. ही बाब ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी प्रेरणादायी आहे.

000

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

ठाणे

000000000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp