
मुंबई, दि. १३ : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्प (पीएसपी) माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलऊर्जा क्षेत्रातील १२०० मेगावॅट वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग व नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड समवेत सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, जलसंपदा (लाभक्षेत्र विकास) सचिव संजय बेलसरे, नोव्हॅरियन एनर्जीचे अरुण लखानी, सारंग लखानी तसेच जलसंपदा व ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध करारांद्वारे राज्यात एकूण 78218 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार असून यासाठी 4 लक्ष 22 हजार 461 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाख 27 हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. विशेषतः अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
राज्य शासनाने आत्तापर्यंत ऊर्जा निर्मितीसाठी विविध कंपन्यांसोबत ऊर्जा क्षेत्रात 55 सामंजस्य केले आहेत. या करारांमध्ये टाटा पॉवर कंपनी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी ग्रीन एनर्जी, टोरेंट पॉवर लिमिटेड यासह विविध उद्योग समूहांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :-
उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार
या प्रकल्पद्वारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती; या प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती
या कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी ता. महाड जि. रायगड येथे प्रकल्प उभारणी होणार
००००
किरण वाघ/विसंअ
