
मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ वडाळा येथे आयोजित करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती, महसूल विभागाशी संबंधित सेवांचा लाभ तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण यावेळी करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार डॉ. मनिषा कायंदे, मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात उपस्थित होते.

या अभियानामुळे सामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी होऊन महसूल प्रशासन ‘वेगवान आणि पारदर्शक सेवा’ देण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचा विश्वास आमदार कालिदास कोळंबकर यांनी व्यक्त केला.
डिजिटल सेवा, महसूल संहितेतील नव्या तरतुदी आणि विविध शासकीय योजना यांबाबत जनजागृती होत असल्यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जात असल्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रास्ताविकात सांगितले.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अर्जांची तत्परतेने छाननी करून आवश्यक मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये १९ शासकीय कार्यालयांनी स्टॉल लावले होते. या विभागांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
यावेळी लाभार्थीना शासकीय विभागांमार्फत विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस, तसेच शासनाच्या इतर विभागाचेही सहकार्य लाभले.
0000
