
बुलढाणा दि. २(जिमाका): खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे जिल्ह्याचे खासदार व केंद्रीयराज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय रेल्वे अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत .
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे .या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे .त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता .केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावतीने सातत्याने रेल्वेमंत्री आणि रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे .खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहण करणे हेतू अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे .
रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ च्या कलम ३७A अन्वये S.O. 2647(E). रेल्वे अधिनियम, १९८९ (१९८९ चा २४) च्या कलम २ च्या खंड (३७A) अन्वये (ज्याचा यापुढे ‘रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८’ (२००८ चा क्र. ११) असा उल्लेख केला जाईल) प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकार याद्वारे “जालना-खामगाव दरम्यान नवीन बीजी (BG) मार्ग प्रकल्प (१६२ किमी)” यास, मध्य रेल्वे अंतर्गत “विशेष रेल्वे प्रकल्प” म्हणून अधिसूचित करते. ही अधिसूचना महाराष्ट्रातील जालना आणि खामगाव जिल्ह्यांमध्ये जमिनीचे संपादन करण्यासाठी आणि सार्वजनिक उद्देशाकरिता राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून, ती या अधिसूचनेच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल असे या राजपत्रामध्ये म्हटले आहे .
बॉक्स
रेल्वे मार्गासाठी केंद्रीयराज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न
इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हावा ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची मागणी होती .लोकसभेच्या अनेक निवडणुकीमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाचा मुद्दा घेवून निवडणूक लढल्या जात होत्या .
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन 2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी ही खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली त्यानंतर हा रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात संदर्भात केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली त्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून या रेल्वे मार्गासाठी 50% निधीची तरतूद करून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता . केंद्र सरकारचा 50% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सातत्याने भेटी घेवुन या रेल्वे मार्गाचा संदर्भात पाठपुरावा करत होते या संदर्भातील प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता . अखेर खामगांव-जालना या रेल्वे मार्गासाठी भूमी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्र मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये खामगाव येथे जाहीर झालेल्या जाहीर सभेत हा रेल्वे मार्ग पूर्ण करणार असल्याचे अभिवचन जिल्हावासियांना दिले होते. या रेल्वे मार्ग साठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहेत .
00000
