Pune | Fri, 17 July 2026

Ad

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

Sunil Goyal | 1 views
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • शहादा तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा
  • विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस

नंदुरबार, दि. १७दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयार केलेला 117 कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा वर्षाभरावर आला असल्याने या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

शहादा तालुकास्तरीय बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जि. प. उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रकाशाच्या सरपंच आदी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज प्रकाशा येथील प्रसिद्ध श्री केदारेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन गौतमेश्वर तीर्थस्थळाची पाहणी केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले, कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे येतात, त्यांच्या सोयी-सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मुख्य निधी मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून (DPDC) तात्पुरता आराखडा तयार करून तातडीने सुविधा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रकाशाच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विविध शासकीय विभागांचा घेतला आढावा

तीर्थक्षेत्र पाहणीनंतर शहादा तहसील कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. महावितरणने स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांचा विरोध असल्यास त्यांना विश्वासात घेऊन योग्य माहिती द्यावी. तसेच रूफ टॉप सोलर कनेक्शन वाढवण्यावर भर द्यावा. पोलीस विभागाने गावठी दारू व गुटखाबंदीवर कडक कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे त्यांनी सांगितले.

‘लाडकी बहीण योजने’त कमी झालेल्या अर्जांची कारणे शोधून योग्य ती कारवाई करावी. ‘संजय गांधी निराधार योजने’चे प्रलंबित मानधन त्वरित अदा करावे, तसेच घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते व पुरेशी वाळू उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व पटसंख्या सुधारण्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांना मानधनावर इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी शिक्षण समितीमार्फत प्रोत्साहित करावे. पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना कराव्यात, तसेच जमीन मोजणीच्या तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यानी दिल्या.

विषबाधित विद्यार्थ्यांची घेतली भेट

काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाच्या अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत घडलेल्या विषबाधेच्या घटनेची गंभीर दखल घेत, पालकमंत्र्यांनी या वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp