Pune | Sun, 05 April 2026

Ad

एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे

Sunil Goyal | 8 views
एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे

मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्‍ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचा यामध्ये सहभाग असून १ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या शेतीशाळांचा सर्व शेतकऱ्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

विशेष डिजिटल शेतीशाळांचे  वेळापत्रक व विषय :- शेतीशाळा- १ (१ एप्रिल २०२६) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे व  बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया, शेतीशाळा- २ (८ एप्रिल २०२६): जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे, शेतीशाळा- ३ (१५ एप्रिल २०२६): एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर, शेतीशाळा- ४ (२२ एप्रिल २०२६) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत. सर्व शेतीशाळा वर नमूद तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे लाइव्ह प्रसारण  कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या यू-ट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपरिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता  “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” सुरू करण्यात आले. हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत.  या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या पीक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्‍ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टेधारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp