Pune | Mon, 06 April 2026

Ad

कोयना दौलत डोंगरी महोत्सव काळाची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sunil Goyal | 3 views
कोयना दौलत डोंगरी महोत्सव काळाची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. ६: सातारा जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन हब’ बनविण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.‍

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा सांगता समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलतनगर येथील शिवदौलत स्टेडियम व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथील संगीत कारंजे व लेझर शो, तसेच स्व. शिवाजीराव देसाई स्मृतिभवनाचे उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर पापर्डे येथील दूरदृश्यप्रणालीद्वारे जल पर्यटन केंद्राचेही उद्घाटनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापक निलेश घटने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई,  आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पर्यटन विकासासाठी व महाबळेश्वरवरील पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘नवीन महाबळेश्वर’ विकसित केले जात आहे. यामुळे स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव मिळेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. डिसेंबर-जानेवारीमध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे. हा महोत्सव जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

शहरांमध्ये नेहमीच मोठमोठे सांस्कृतिक महोत्सव होत असतात पण डोंगरी भागात राहणाऱ्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी शेतकरी बांधवांना कोयना दौलत डोंगरी महोत्सवासारख्या महोत्सवांमधून सांस्कृतिक मेजवानी दिली जात आहे. यामध्ये भजन कीर्तन, लावणी,पोवाडा,खाद्य जत्रा याबरोबरच पॅराग्लायडिंग, सी-प्लेन राईड आणि स्कूबा डायव्हिंग यांसारख्या साहसी खेळांना चालना दिली जात आहे. यातून अनेक कलाकारांना देखील व्यासपीठ मिळत आहे.

वासोटा आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी अर्थसंकल्पात रोपवे मंजूर करण्यात आला आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीसाठी पुलांची उभारणी केली जात आहे. यामध्ये कोयना नदीवर तापोळा आणि आपटी येथे मोठे पूल बांधले जात आहेत, ज्यामुळे दुर्गम भागातील १०५ गावे जोडली जातील आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी आणि युवकांसाठी योजना क्लस्टर शेती उपक्रम राबविला जात आहे. जेणेकरून कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल. बांबूला आता ‘गवत’ वर्गात समाविष्ट केल्याने त्याच्या लागवडीसाठी मनरेगातून अनुदान दिले जात आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ८,००० एकरवर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. बोंडारवाडी धरणाच्या कामाला चालना देण्यात येईल, सातारा एमआयडीसी मध्ये चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजनाही प्राधान्याने राबविली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

आपली बांधिलकी सर्वसामान्य लोकांशी आहे त्यातूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली. ई-केवायसीसठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकरी सन्मान: ‘नमो शेतकरी सन्मान योजने’द्वारे शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रुपये (केंद्र व राज्य सरकार मिळून) दिले जात आहेत. लोकांच्या कामासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, डोंगरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षापासून या महोत्सवाचा कालावधी वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे. या डोंगरी महोत्सवात कृषी प्रदर्शन, बचत गटांचा मेळावा, पोवाडे, भजन, ब्रास बँड यांसह विविध कार्यक्रमांच्या आयोजना बरोबरच दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी पाटण तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतील विविध विकासकामांचे उद्घाटन आज झाले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच तारळी धरणातील ‘शंभर हेड’वरून शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य झाले. तसेच मोरणा-गुरेघर धरणातील पाणीही नदीपात्रात सोडण्यात आले असून, याचा फायदा दोन्ही तीरांवरील शेतकऱ्यांना झाला आहे. यापुढील काळातही पाटण तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी या परिसरातील नागरिक, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशराज देसाई यांनी आभार मानले.

०००

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp