
मुंबई, दि. ७ : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन बाधित झाले आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर युद्धामुळे विपरीत परिणाम होत आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या फिक्की संस्थेने या युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेषतः सेवा तसेच सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योगांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करावे व नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने शिफारसी कराव्या असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
युद्धामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर देखील विपरीत परिणाम होत आहे. काही कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली आहे. युद्धाची झळ जनसामान्यांना बसू नये याकरिता शासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ‘फिक्की’ने देखील लोकांच्या कौशल्य वर्धनासंबंधी शिफारशी कराव्या असे राज्यपालांनी सांगितले. फिक्कीने राज्यातील विद्यापीठांसोबत काम करावे तसेच स्नातकांसाठी प्रशिक्षणाच्या संधी निर्माण कराव्या असे आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केले.

भारत ही सर्वात जलद गतीने वाढत असलेली अर्थव्यवस्था असून राज्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान सर्वाधिक असून राज्य थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे. राजशिष्टाचार विभागाने थेट परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी व देश विदेशातील महाराष्ट्राच्या लोकांना राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून फिक्की संस्थेची सुरुवात मुंबई येथे झाली. पुढील वर्षी फिक्की शताब्दी वर्ष साजरे करीत आहे, असे फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका यांनी यावेळी सांगितले. .
यावेळी राज्यपालांच्या हस्ते फिक्कीचे गेल्या तीस वर्षांमधील माजी अध्यक्ष राजीव भारती मित्तल, हर्ष पती सिंघानिया, राजीव चंद्रशेखर, हाबिलं खोराकीवाला, हर्ष मरीवाला, सरोज कुमार पोद्दार, ओंकार कंवल, डॉ. ए. सी. मुथैय्या, राजेंद्र लोढा, चिरायू अमीन, सुधीर जालान, के के मोदी, ए एस कासलीवाल, दीपक बँकर, ए. के. रुंगटा आदींचा त्यांच्या उद्योग जगातला दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शंकर, संस्थेच्या महासंचालक ज्योती वीज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.
०००
