
मुंबई, दि. ८ : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा परिसरात ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महावितरणच्यावतीने लवकरात लवकर शिबिराचे आयोजन करून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. तसेच या परिसरातील वाढत्या वीजची मागणी लक्षात घेता १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्यात यावेत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिले.
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या कार्यालयात आवास ते रेवदंडा किनारपट्टी परिसरातील वीजेच्या वाढत्या मागणीसंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, अलिबाग मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेश भगत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे, कार्यकारी अभियंता अविनाश पगारे, सतीश धारप, वैकुंठ पाटील, संकेत जोशी, उदय काठे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, अलिबाग तालुक्यातील आवास ते रेवदंडा या किनारपट्टीच्या गावामध्ये सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांनी घराघरात छोटे कॉटेज, होम-स्टे व इतर पर्यटनपूरक सुविधा निर्माण केल्या आहेत. या परिसरात वाढलेल्या पर्यटन व्यवसायामुळे विजेची मागणी लक्षात घेता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने येथील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. याचबरोबर या परिसरात शिबिराचे आयोजन करून ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करावे तसेच या शिबिरात पीएम सूर्य घर योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचावावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
००००
गजानन पाटील/स.सं.
