
मुंबई,दि. ४ : विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, या बदलांना सामोरे जाण्यासाठी युवकांना आधुनिक कौशल्ये देणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित वाय४डी (युथ फॉर डेव्हलपमेंट) ‘इंडिया @ २०४७ – पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, युथ फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रफुल निकम यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. देशातील २५ कोटी नागरिक अतिदारिद्र्यातून बाहेर आले असून पायाभूत सुविधा, निवास, स्वच्छता आणि उपजीविकेच्या संधींमुळे सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी युवकांच्या लोकसंख्यात्मक लाभाचे रूपांतर आर्थिक शक्तीत करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचे नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात राज्य शासनाने ‘महाविस्तार’ हे ॲप विकसित केले असून त्याद्वारे लाखो शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान, कीडनियंत्रण आणि सिंचनासंबंधी माहिती उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. हे ॲप विविध भाषांमध्ये कार्यरत असून तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील हजार दिवसांत सुमारे ७० टक्के रोजगारांचे स्वरूप बदलणार असून या बदलत्या व्यवस्थेत युवकांना सुसंगत कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी शासन, उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांच्या माध्यमातून जलसुरक्षा, आरोग्य, कौशल्य विकास आदी क्षेत्रांत प्रभावी काम होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही कामे तळागाळापर्यंत पोहोचविण्यात वाय४डी ने प्रभावी दुवा म्हणून भूमिका बजावली आहे. गेल्या ११ वर्षांत सामाजिक परिणामकारकतेवर आधारित विश्वासार्ह कार्य उभे केले आहे. सामंजस्य करारांपेक्षा प्रत्यक्ष कामाचा समाजावर झालेला परिणाम मोजून ‘इम्पॅक्ट रिपोर्ट’ सादर करण्याची संकल्पना अभिनव असून, अन्य सीएसआर भागीदार संस्थांनीही या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी विविध उद्योग समूहांच्या सामंजस्य करारांच्या कार्यामुळे झालेल्या परिणाम अहवालांचे प्रकाशन करण्यात आले. समाजपरिवर्तनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व उद्योग समूहांचे तसेच वाय४डी संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
0000
वंदना थोरात/विसंअ
