
मुंबई, दि. १७ : राज्यात स्वच्छता मोहीम राबविताना जनजागृती बरोबरच गाव स्वच्छतेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या संकल्पनेचा अंगीकार करत राज्यभरात सुरु होणाऱ्या ‘स्वच्छतोत्सव’ २०२५ चा शुभारंभ पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे अतिरिक्त मिशन सचिव शेखर रौंदळ यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, गावातील नागरिक, महिला बचत गटातील कार्यकर्त्या अशा व्यक्तींना गावातील ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून नामनिर्देश करून त्यांना या मोहिमेत सामावून घ्यावे. स्वच्छता मोहिमेकरिता शासनाने सर्व पातळ्यांवर सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छता ही सेवा २०२५’ फक्त एक मोहीम नसून, संपूर्ण राज्याने एकत्र येऊन गाव-गावात, घराघरात स्वच्छतेचा दीप प्रज्वलित करण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ ला बळ देत, महाराष्ट्राने पुन्हा पथदर्शी काम करावे.
या कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, महिला बचत गट, युवक यांचा समावेश करून लोकसहभाग वाढवावा, हेच या मोहिमेचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधान सचिव खंदारे यांनी, गावात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात याव्यात. जिथे नियमित कचरा एकत्र करण्यात येतो. अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सुशोभीकरण करावे. शाळांमार्फत रॅली, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी, आणि जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवावे असे निर्देश दिले.
अतिरिक्त मिशन सचिव रौंदळ यांनी यावेळी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
१७ सप्टेंबर २५ ते २ ऑक्टोबर २५ दैनंदिन कार्यक्रम
१७ सप्टेंबर- राज्यस्तरीय शुभारंभ
१८ सप्टेंबर- प्रबोधनपर उपक्रम
१९ सप्टेंबर- कचरा वर्गीकरण, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, स्पर्धा
२० सप्टेंबर – प्लास्टिक वापरण्याबाबत जनजागृती, शून्य कचरा, उपक्रम, ३-आर मोहिम
२१ सप्टेंबर – कंपोस्ट खत,शोष खड्डा निर्मिती
२२ सप्टेंबर – अस्वच्छ ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता, शास्त्रीयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट.
२३ सप्टेंबर – ‘एक झाड आईच्या नावे’, गृहभेट जनजागृती
२४ सप्टेंबर – सायकल मॅरेथॉन, रॅली, मानवी साखळी
२५ सप्टेंबर – ‘एक दिवस, एक घंटा, ‘एकत्र श्रमदान’ उपक्रम
२६ सप्टेंबर- प्रकल्प उद्घाटन
२७ सप्टेंबर – ग्रामपंचायत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा
२८ सप्टेंबर – सफाई मित्र सुरक्षा शिबिर
२९ सप्टेंबर – शाळांमध्ये स्वच्छता धडे
३० सप्टेंबर – स्वच्छता वाहने व उपकरणांचे नूतनीकरण
१ ऑक्टोबर- स्वच्छता प्रतिज्ञा
२ ऑक्टोबर – ग्रामसभा व स्वच्छता दिवस
०००
राजू धोत्रे/विसंअ
